Momin Saqib: दुबई: आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (ind vs pak) यांच्यात एक जबरदस्त सामना झाला. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला. (India Won) या पराभवानंतर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मोमिन साकिबची (momin saqib) आश्चर्यकारक प्रतिक्रिया आता व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये तो रुग्णवाहिका शोधताना दिसत आहे. (mujhe maaro meme fame momin saqib meets virat kohli hardik pandya after ind vs pak match)
आशिया कपच्या जबरदस्त सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. दुबईत रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत लढत पाहायला मिळाली. पण भारताने पाकिस्तानवर शेवटच्या क्षणी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यापैकी एक खास प्रतिक्रिया आहे ती आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेत असलेल्या मोमिन साकिब याची.
अधिक वाचा: IND vs PAK: कोहलीचा तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळणारा विराट ठरला जगातील दुसरा क्रिकेटपटू
मॅचच्या दिवशी मोमिन साकिबने इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये तो भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे जेव्हा बाद झाले तेव्हा मोमिन मैदानावरच रुग्णवाहिका शोधताना दिसला. व्हिडिओमध्ये तो रडत-रडत म्हणत होता की, 'आता काय करावे बाबरही आऊट झाला, रिजवानही गेला . माझ्यासाठी रुग्णवाहिका घेऊन या.'
याशिवाय एका व्हीडिओमध्ये मोमिन साकिब रडताना दिसत आहे, ज्यामध्ये तो टिश्यूने अश्रू पुसत आहे. येथे मोमिन सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये बसून सतत आपले अश्रू पुसत असल्याचं पाहायला मिळालं होतं. हा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
सामना संपल्यानंतर मोमिन शकीबने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि या सामनचा मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या हार्दिक पंड्या यांची भेट घेतली. यावेळी विराट कोहलीशी संवाद साधताना मोमिन शकीब असंही म्हणाला की, 'मला आशा आहे की अंतिम फेरीत दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील.'
मोमिन साकिब हा सोशल मीडियावर एक मोठा सुपरस्टार आहे. वनडे वर्ल्डकप 2019 मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते, त्यावेळी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने प्रतिक्रिया दिली होती की, 'ओ भाई, मारो मुझे.' तेव्हापासून मोमिन साकिब सोशल मीडियावर लोकांचा पसंतीस पडत आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने आशिया चषक मिशनची सुरुवात विजयाने केली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकात जाऊन सामना जिंकला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने 33 धावा करत 3 बळी घेतले. तर हार्दिकने कमी चेंडूत जबरदस्त खेळी करत भारताला पाच गडी राखून विजय मिळवून दिला.