मुंबई: भारत (India)विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) टी20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात यष्टीरक्षक (Wicketkeeper)-अन् फलंदाज (Batsman) असलेल्या ऋषभ पंत (Rishabh Pant) याची निवड झाली आहे. यावेळी ऋषभ पंतने बायो बबलच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या आयपीएल 2022 च्या सामन्यांमध्ये पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं यावेळी देखील दमदार कामगिरी केली होती. परंतु या दरम्यान त्याच्या संघाला कोरोनाचा सामना करावा लागला होता. द.आफ्रिकेविरुद्धातील सामन्यांमध्ये निवड झाल्यामुळे आनंदी असलेल्या पंतने आपल्या करिअरविषयीही दिल खुल्लास गप्पा केल्या. फक्त फलंदाज किंवा गोलंदाज न होता तो यष्टीरक्षक का झाला याची माहितीही त्याने दिली आहे.
या मालिकेत खेळाडूंना विना बायो बबल खेळण्यास परवानगी दिली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याने खेळाडूंसाठी नियमावली आखण्यात आली होती. मात्र यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत होता, असंही ऋषभ पंत म्हणाला. तर आपण यष्टीरक्षक अन् फलंदाज का झालो? यामागचं कारणही त्याने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. 24 वर्षीय ऋषभ पंतनं आतापर्यंत 30 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 43 टी 20 सामने खेळले आहेत. काही माजी खेळाडूंनी भारताचं नेतृत्व करण्याचे सर्व गुण ऋषभ पंतमध्ये असल्याचं देखील सांगितलं आहे. आपल्या यष्टीरक्षक-फलंदाजाचं करिअर निवडण्यामागे काय कारण याविषयी बोलताना पंत म्हणाला, “जेव्हा मी मैदानावर येतो तेव्हा मी नेहमीच माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. मी यष्टीरक्षक-फलंदाज आहे, कारण मी लहानपणापासूनच कीपिंग करायला सुरुवात केली होती. कारण माझे वडील देखील विकेटकीपर होते. मग मीही विकेटकीपिंगला सुरुवात केली.", असं ऋषभ पंतने सांगितलं.
ऋषभ पंतने सांगितले की, “बायो-बबलमधून बाहेर पडणे खरोखरच खूप चांगलं आहे आणि आशा आहे की यापुढे बायो-बबलसारखी परिस्थिती राहणार नाही. मला हा निर्णय ऐकून खूप आनंद झाला. जेव्हा तुम्ही वर्षभर खेळता, विशेषत: दबावात तुमच्या मनाला विश्रांती देणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही तणाव दूर करू शकत नसाल तर तुम्ही शंभर टक्के देऊ शकत नाही. यासाठी तणावमुक्त राहणं गरजेचं असतं.”
केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.