Sanjay Manjrekar On Rohit Sharma | मुंबई : सध्या क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आयपीएलची. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ लयमध्ये नसल्याचे चित्र आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने पहिले चार सामने गमावले आहेत. आज मुंबईचा सामना पंजाब किंग्जविरूद्ध होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनामुळे मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत झाली असली तरी गोलंदाजीतील उणीवा अजूनही स्पष्टपणे दिसून येत आहेत.
दरम्यान, आजच्या पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट विश्लेषक संजय मांजरेकर यांनी मुंबईच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, "मला वाटते की रोहित शर्माही विराटप्रमाणे आयपीएलमधील कर्णधारपद सोडेल, पण तसे झाले नाही."
अधिक वाचा : गुरूग्राममध्ये प्रसादाच्या नावाखाली पाजले अमली पदार्थ
ESPNcricinfo वर संजय मांजरेकर म्हणाले की, "रोहित मागील तीन हंगामापासून त्याला साजेशी अशी फलंदाजी करत नाही, तो कुठेतरी दबावात असल्याचे पाहायला मिळते. त्याचा स्ट्राईक रेटही फारसा चांगला दिसत नाही. या आयपीएलपूर्वी तो कायरन पोलार्डकडे कर्णधारपद सोपवेल आणि विराटसारखा फलंदाज म्हणून खेळेल असे मला वाटले होते."
याशिवाय मुंबई इंडियन्ससाठी आणखी फलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागेल असे संजय मांजरेकर यांनी म्हटले. केवळ सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळ केल्याने काहीही होणार नाही. मला पोलार्डवर पूर्ण विश्वास आहे आणि दबावाच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल, पण त्याला जिथे पोहोचायचे आहे ते सर्वकाही पोलार्डवर अवलंबून नाही असेही मांजरेकर म्हणाले. पोलार्डची भूमिका अशी आहे की तो प्रत्येक डावात धावा करतोच असे नाही, पण दबावाच्या वेळी तो आक्रमक खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
आज होणारा पंजाब विरूद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठीही खूप महत्त्वाचा आहे कारण हा सामना जर संघाने जिंकला नाही, तर प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबईला उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान आठ सामने जिंकावे लागतील. या हंगामात आतापर्यंत एकही सामना न जिंकलेला मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. गेल्या हंगामातही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये पाच विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे.