RCB's Playoff Scenario | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नशीब चालू हंगामात चमकताना दिसत नाही. कारण शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ५४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर अव्वल ४ मध्ये असूनही प्लेऑफमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण आव्हान बनले आहे. आरसीबीच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये संघाला ७ विजय आणि ६ पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीच्या खात्यात सध्या १४ गुण असून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. (What will RCB's path to playoff be like after the defeat against Punjab).
अधिक वाचा : श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर
अशा परिस्थितीत आरसीबीसमोर प्लेऑफचा रस्ता पार करण्यासाठी काही गणिती समीकरणे आली आहेत. त्यांना पार केल्यानंतरच आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. या समीकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९ मे रोजी गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यात आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायला हवा.असे झाल्यास त्यांचे ८ विजयांसह एकूण १६ गुण होती. तसेच संघ पहिल्या ४ मध्ये राहील मात्र नेट रनरेट पुढील मार्ग निश्चित करेल.
पंजाब किंग्जसमोर विजयासाठी २१० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १५५ धावा करता आल्या. त्यामुळे ५४ धावांच्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे आरसीबीचा नेट रनरेट -०.१२० वरून -०.३२३ वर घसरला आहे. अशा स्थितीत उर्वरित १० सामन्यांचा थरार आणखी वाढला चालला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ वगळता इतर सर्व संघांना आणखी २-२ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आगामी सर्वच सामने प्लेऑफसाठी निर्णायक असणार आहेत.
दरम्यान, १९ मे रोजी गुजरात विरूद्ध बंगळुरू यांच्या सामन्यापूर्वी १० मधील ७ सामने झालेले असतील त्यामुळे या सामन्याच्या आधीच काही अंशत: प्लेऑफचा मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस अन्य संघाचे प्रदर्शन पाहून रणनिती करून आपली योजना करण्याची आरसीबीकडे संधी असणार आहे.