नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एका फेक व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एका निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. भारतात कोविड-१९ रुग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीसंदर्भातील हा व्हिडिओ आहे. १५ एप्रिलपर्यत कोविड-१९मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,००० इतकी असेल असे या व्हिडिओत जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत म्हटले आहे. मात्र आपल्या निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने हा दावा आणि माहिती देणारा व्हिडिओ फेक असून आपला त्या व्हिडिओतील माहितीशी कोणताही संबंध नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.
'एका व्हिडिओमध्ये भारतात १५ एप्रिलपर्यत कोविड-१९मुळे ५०,००० मृत्यू होणार असल्याची माहिती पसरवण्यात येते आहे. मात्र ही एक फेक बातमी असून जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकारची कोणताही चेतावनी जाहीर केलेली नाही,' असे जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आज सकाळी स्पष्ट करण्यात आले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पुढील ७२ ते १०० तास हे अत्यंत महत्त्वाचे असून १५ एप्रिलपर्यत कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ५०,००० पर्यत जाण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. डब्ल्यूएचओ आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ही चेतावनी दिली असल्याचे यात म्हटले आहे. भारत संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात लवकरच पोचण्याची शक्यता असून जर असे झाले तर भारताच्या लोकसंख्येची घनता पाहता ५०,००० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असेही यात व्हिडिओत म्हटले आहे.
इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा व्हायरल व्हिडिओ सर्वात आधी मागील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात जेव्हा कोरोनाच संसर्ग पसरण्यास सुरूवात झाली तेव्हा समोर आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे भारतातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या एकूण संख्येने याआधीच ५०,००० आकडा ओलांडला असून ६ एप्रिल २०२१ पर्यत एकूण १,६५,५४७ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मंगळवारी देशात कोविड-१९ चे ९६,९८२ नवे रुग्ण आढळले असून ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रिय आरोग्य खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १,२६,८६,०४९ वर पोचली आहे.
मागील वर्षी कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्ण संख्या काल भारतात नोंदवण्यात आली आहे. काल भारतात १,०३,५५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग २७व्या दिवशी भारतात कोविड-१९च्या रुग्णांच्या संख्येत सलग वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७,८८,२२३ इतकी झाली आहे. एकूण संसर्ग झालेल्यांच्यी ६.२१ टक्के इतके हे प्रमाण आहे. देशाचा रिकव्हरी दर आता ९२.४८ टक्के इतका झाला आहे.